fbpx
राजकारण

इतिहासाचा धडा आणि वर्तमानाचे संकट!

१९४७ साली भारतीय उपखंडात एकीकडे स्वातंत्र्य आणि दुसरीकडे फाळणी अशा दोन्ही गोष्टी एकाचवेळी आल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. फाळणीच्या माध्यमातून हिंदू, मुस्लिम आणि शीख यांनी एकमेकांचे केलेले शिरकाण आणि हत्याकांड, आणि स्वातंत्र्यानंतर तेलंगणा आंदोलन, जम्मू – काश्मीर संस्थान विलीनीकरण आणि हैद्राबाद पोलीस कारवाई, या सगळ्या घटनांमुळे खूप मोठा हिंसाचार झाला. त्यामध्ये अनेक लोक मारली गेली. अनेकांचे संसार उद्धवस्त झाले. अनेकांना परागंदा व्हावे लागले. स्त्रिया आणि लहान मुले ही हिंसाचाराची सगळ्यात जास्त बळी ठरली. नव्याने जन्माला आलेल्या भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्या आधुनिक राष्ट्रबांधणीची इमारत ही वरील सगळ्या हत्याकांडांच्या आणि हिंसाचारांच्या रक्ताच्या चिखलाने बांधलेली आहे. म्हणून, भविष्याची चिंतेचा आणि चर्चेचा डोलारा उभा करतांना नेहमी इतिहासाचा धडा घेणे गरजेचे आहे. परंतु मागील काही वर्षांपासून दक्षिण आशियामध्ये हिंसेच्या इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झालेली दिसते. पाकिस्तान आणि बांग्लादेशांमध्ये वाढलेले जमातवादी राजकरण, अफगाणिस्तानात स्थापन झालेले तालिबान सरकार आणि भारतात झपाट्याने सार्वजनिक अवकाश व्यापून टाकणारे आणि लोकशाही मार्गाने एकाधिकारशाहीकडे प्रवास करणारे हिंदुत्ववादी सरकार ही दक्षिण आशियाच्या भविष्याच्या आणि राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा वळणबिंदू  ठरणार आहेत. भारतात मागील तीन-चार वर्षात घडलेल्या पण, दक्षिण आशियाच्या भविष्यावर प्रभाव टाकणाऱ्या काही घटनांच्या आधारे काही मुद्दे समजून घेवूयात.  

  1. कश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यापासून कश्मीरमध्ये भारतीय सरकार विरोधातील असंतोष वाढला आहे. भारत-पाकिस्तान संबंध त्यामुळे पुन्हा बिघडले आहेत. तसेच, काश्मिरी जनतेचे बळाच्या साह्याने दमन केले जात आहे. विरोधी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना दीर्घकाळ केंद्र सरकारने बंदिस्त करून ठेवले होते.
  2. जलिकट्टूच्या आणि हिंदी भाषेच्या सक्ती निमित्ताने तामिळनाडूमध्ये उत्तर भारताच्या विरोधात आंदोलने झाली होती. मागील वर्षी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीत एकही दक्षिण भारतातील व्यक्ती नव्हता म्हणूनही अनेकांनी नापसंती व्यक्त केली होती. तसेच, मुथ्थय्या मुरलीधरनच्या बायोपिकच्या निमित्ताने तामिळनाडूमध्ये पुन्हा तमिळ राष्ट्रवादी लोकांनी मोर्चा बांधणी सुरु केली आहे.
  3. खलीस्तानी दहशतवाद्यांविरुद्ध लढणाऱ्या आणि शौर्य चक्र मिळवणाऱ्या कॉम्रेड बलविंदरसिंह संधू यांची दिवसाढवळ्या खलिस्तानी दहशतवाद्यांनी हत्या केली आहे. तसेच, पंजाबच्या शेतकऱ्यांनी शेतकरी  विरोधी  काळ्या कायद्यांचा सनदशीर आणि अहिंसक पद्धतीने विरोध केला तरीही त्यांना खलिस्तानी, देशद्रोही, दहशतवादी म्हणून हिणवले गेले. काहींनी त्यांना तथाकथित ‘अर्बन नक्षल’च्या धर्तीवर ‘टर्बन नक्षल’ही म्हटले. याप्रकारच्या गोष्टी करून केंद्रातील सत्ताधारी पक्षाने, त्यांच्या समर्थकांनी खलिस्तानी मंडळींचाच जास्त फायदा केलेला दिसतो.
  4. राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे आसाममध्ये राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाने जमातवादी राजकारण करून सामाजिक आणि धार्मिक धृवीकरण करून आसाममध्ये विद्वेषाची बीजे पेरली गेली आहेत. बांग्लादेशातील घटनांना प्रतिक्रिया म्हणून त्रिपुरामध्ये मुस्लिमविरोधी घटना घडल्या आहेत आणि त्याचा परिणाम संपूर्ण देशावर झाला आहे.

मागील आठवड्यातच नागालँडमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या हत्या झाल्या आहेत. वरील चारही  घटना जरी भारतातील असल्या तरी त्यांचा परिणाम हा दक्षिण आशिया आणि संपूर्ण जगावर होणार आहे. कारण, जगभरात कश्मिर, तमिळ, ईशान्य भारतीय आणि खलिस्तानी चळवळ यांचे समर्थक आणि विरोधक मंडळींचे जाळे आहे.   

दक्षिण आशियाची स्थितीगती:

पाकिस्तानपासून ते ब्रह्मदेश आणि भारत, श्रीलंकापासून ते बांग्लादेश ही सगळी भूमी ब्रिटीश साम्राज्याची भाग होती. त्यामुळे ब्रिटीश साम्राज्याच्या अनेक गरजांसाठी मजुरांचे स्थलांतर होत होते. तसेच, व्यापार आणि व्यवसायाच्या निमित्तानेही लोक स्थलांतरित होत होती. म्हणूनच अनेक पंजाबी शीख लोक आसाम राज्यात दिसतात. तमिळ लोक श्रीलंका आणि इतर देशांमध्ये दिसतात. बंगाली लोक ब्रह्मदेशात आणि आसामात दिसतात. अशी अनेक उदाहरणे दक्षिण आशियामधील वेगवेगळ्या देशांमध्ये आणि त्यांच्यातील राज्यांमध्ये होते आणि आहेत. परंतु, दक्षिण आशियामध्ये धार्मिक आधारावर फाळणी झाल्यामुळे तसेच, धर्मांध, राष्ट्रवादी आणि वांशिक ध्रुवीकरणाचे राजकारण वाढल्यामुळे अनेक भयानक गोष्टी मागील साठ – सत्तर वर्षात घडल्या आणि घडवल्या गेल्या आहेत. भारतातील प्रधानमंत्र्यांचे खून झाले आहेत. पाकिस्तानात लष्करी राजवट लावल्या गेल्या आणि सगळ्या दक्षिण आशियामध्ये भाषिक, वांशिक आणि धार्मिक अल्पसंख्याकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. त्यातूनच पूर्व पाकिस्तानमधून भाषा आणि संस्कृतीच्या मुद्द्यावर वेगळे होत बांग्लादेशाची निर्मिती झाली. तशीच चर्चा भारतात  स्वतंत्र तामिळनाडूची आणि खलिस्तानची होती. स्वतंत्र तमिळ आणि स्वतंत्र खलिस्तान चळवळीतून तमिळ राष्ट्रवाद आणि पंजाबी/शीख राष्ट्रवादाची चर्चाही झाली. काहींनी त्याला तमिळ दहशतवाद आणि खलिस्तानी दहशतवाद असेही म्हटले आहे. पाकिस्तानात अहमदिया मुस्लिमांचे प्रश्न आहेत. तसेच, सिंध आणि बलुची लोकांचेही अनेक प्रश्न आहेत. ब्रह्मदेशात रोहिंग्या मुस्लिमांना अमानवी वागणूक दिली जात आहे आणि भारतात काश्मिर प्रश्नांचा गुंता पुन्हा जटील बनत आहेत. त्यामुळे दक्षिण आशियातील नेत्यांनी आणि देशांनी भविष्याकडे आगेकूच करायची असेल तर नव्याने आपला इतिहास पुन्हा समजून घेतला पाहिजे. दक्षिण आशियाच्या आर्थिक प्रगतीचे आणि मानव विकासाचे प्रश्न शांतता सोडवू शकते.

 

सत्तेच्या केंद्रीकरणाला प्रादेशिक प्रतिरोध:

भारतात काही दिवसांपासून हिंदुत्ववादी राजकारणाचा जोर वाढल्यामुळे सुद्धा अनेक प्रश्न आणि समस्या उद्भवत आहेत. झपाट्याने वाढणारे सत्तेचे केंद्रीकरण हे भारताच्या भविष्याच्या दृष्टीने घातक आहे. भारतामध्ये हिंदू राष्ट्रवादी भाजपला जेवढे जास्त राजकीय यश येईल, तेवढा जास्त राजकीय धोका भारतीय संघराज्य पद्धतीत निर्माण होईल असे दिसत आहे. कारण, भारताच्या इतिहासात जेव्हा जेव्हा अतिरेकी केंद्रीकरण झाले आहे. त्यावेळी प्रादेशिक, भाषिक आणि वांशिक समूहांनी, गटांनी प्रतिरोध करत आपआपली स्वायत्तता आणि स्वतंत्रता जपलेली आहे. म्हणूनच, उत्तर भारतीय सांस्कृतिक आणि भाषिक रेटा दक्षिण भारतावर लादणे हे घातक सिद्ध होवू शकते. जलिकट्टू, हिंदी भाषेच्या मुद्यावरून तामिळनाडूमध्ये मोठी प्रतिक्रिया तमिळ अस्मितावादी लोकांकडून आली होती. तशीच काहीशी चर्चा ‘भारतीय संस्कृती’च्या अभ्यासासाठी नेमलेल्या कमिटीच्या निमित्ताने आली आहे. तमिळनाडूतील या सगळ्या गोष्टींचे बारकाईने निरीक्षण केल्यास असे स्पष्टपणे दिसून येईल की, जरी लिट्टेचा खात्मा झालेला असला तरी अजूनही  तमिळ राष्ट्रवाद हा तमिळनाडूमध्ये प्रभावी  आहे. मुथ्थय्या मुरलीधरनच्या बायोपिकच्या निमित्ताने तामिळ राजकीय वर्तुळात, तामिळ कलेच्या वर्तुळात जी प्रतिक्रिया आली आहे. ती त्याचेच लक्षण आहे.  श्रीलंकेत झालेल्या तामिळांच्या हत्याकांडाविरुद्ध  श्रीलंकन तामिळ असलेल्या मुरलीधरनने काहीही भूमिका घेतली नाही म्हणून त्यावर निघणाऱ्या चित्रपटात काम करू नये म्हणून दबाव आणला जात आहे. तसेच, मुरलीधरन हा देशद्रोही ठरवला जात आहे. बंगालमध्ये ममताच्या नेतृत्वाखाली तृणमूल कॉंग्रेस, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा प्रयोग – त्यातही प्रामुख्याने शिवसेनेने उघडलेली भाजपविरोधी मोहीम, तामिळनाडूत डीएमकेतील स्टॅलिनचे नेतृत्व आणि केरळात दुसऱ्यांदा सत्तेवर आलेले मल्याळी कम्युनिस्ट सरकार ही एक वेगळ्या प्रकारची केंद्रीय भाजप सरकारला प्रादेशिक प्रतिक्रिया आहे.

कॉम्रेड बलविंदरसिंह संधू यांची झालेली हत्या ही पंजाबात खलिस्तानी कारवाया पुन्हा जोर पकडत आहेत याचे लक्षण आहे. मागील काही वर्षांमध्ये युरोपात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरोधात काढलेल्या निर्देशन मोर्चांमध्ये खलिस्तानी गटांचा सहभाग दिसून आलेला आहे. भारतात भाजपचा आणि हिंदुत्वाचा चढताक्रम पाहता पंजाबात खलिस्तानी गटांनी आक्रमक होणे ही त्याचीच प्रतिक्रिया आहे. कारण, १९८० च्या दशकांमध्ये झालेल्या शिखविरोधी हिंसाचारात अजूनही न्याय मिळालेला नाही अशी भावना असलेली दिसून येते. पंजाबात सामाजिक आणि राजकीय समीकरणे बदलायला सुरुवात झालेली आहे. अकाली दलाची सत्ता जावून कॉंग्रेसची सत्ता येणे आणि शेतकऱ्यांची आंदोलने तीव्र होणे ही पंजाबातील सामाजिक पृष्ठभूमीखाली घडणाऱ्या बदलांची लक्षणे आहेत असे दिसते. त्यामुळेच अकाली दलाने शेतकरी प्रश्नांवर भाजपविरोधी भूमिका घेतली आहे. शेतकरी आंदोलनात सगळ्यात प्रथम पंजाबी शेतकरी संघटीतपणे उतरले. त्यांच्या धर्माला, संस्कृतीला बदनाम करण्याचे तसेच शेतकऱ्यांना बदनाम करण्याचे कार्यक्रम राबविले गेले. परंतु, देशभरातील शेतकरी पंजाबमधील शेतकऱ्यांसोबत जोडलेले गेले. त्यामुळे सरकारला एका वर्षानंतर कायदे मागे घ्यावे लागले. 

ईशान्य भारतातील लोकांचा रोष कमी करण्यासाठी अनेक दशके भारत सरकारला प्रयत्न करावे लागले होते. ईशान्य भारतातील नाराज आणि बंडखोर लोकांशी संवाद-बैठका, चर्चा आणि तडजोडी करून शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न होत होता. त्यातही, सैन्याला असलेल्या विशेषाधिकारांच्या विरोधात अधूनमधून चळवळी, मोर्चे होत होते. परंतु, इरोम शर्मिला सारखे दीर्घकाळ चालतील असे आंदोलन, चळवळी किंवा सत्याग्रह झाले नाहीत. माघील आठवड्याच्या घटनेनंतर मात्र ईशान्य भारतात अशांतता पसरेल अशी परिस्थिती निर्माण होईल असे वाटत आहे. तसेही,ईशान्य भारतात आदिवासींमध्ये ख्रिस्ती धर्माचे प्रमाण अधिक आहे आणि मागील काही वर्षांमध्ये संघाच्या कामाचाही व्याप ईशान्य भारतात वाढला आहे. त्यामुळे सांस्कृतिक-धार्मिक तणावही गावोगावी काहीप्रमाणात वाढत आहे असेही दिसते. 

भारतीय लोकांना इतिहासात रमायला आवडते पण इतिहासाकडून  ते काही शिकत नाही असेच दिसते. कारण, आपण नेहमी सारख्याच चूका काही दशकानंतर परत  करत असतो. आपल्या समाजात लोकांना इतिहास रंजकता खूपच आहे पण इतिहास साक्षरता आणि शिक्षण नसल्यामुळे इतिहासातून कोणताही धडा घेतला जात नाही. इतिहासातील महापुरुष, घटना, संस्था, विचारसरणी यांचा अभ्यास करून आणि त्याची साधक बाधक चिकित्सा करून प्रश्न सोडवणे अपेक्षित असते पण, इतिहासातून धडा न घेतलेली मंडळी प्रश्न सोडवत नाहीत तर तो वाढवत असतात. त्याच्यामध्ये अनेकांचे आर्थिक, राजकीय हितसंबंधही असतात. तामिळ अस्मितेचा मुद्दा, खलिस्तानी गट, ईशान्य भारतातील समस्या आणि काश्मिर प्रश्नामुळे भारताचे अनेक पातळींवर नुकसान झालेले आहे. तरीही आपण या मुद्यांवर काही मार्ग काढलेले नाहीत आणि समकालीन परिस्थितीत काही मार्ग काढले जातील असे काही दिसत नाही. त्यामुळेच या मुद्यांना घेवून इतिहासात झालेल्या हिंसाचार आणि हत्याकांड यांच्यातून आपण काहीच धडा घेतलेला नाही असेच म्हणावे लागते.

सहायक प्राध्यापक, इतिहास विभाग,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

1 Comment

  1. Yes our nation is going though a tough time or if we say going through the toughest Time in the whole history, I truly agree with you !!

Write A Comment