fbpx
विशेष सामाजिक

‘सोवळा’ जातीयवाद……

खोले बार्इंच्या तक्रारीतील शब्दन्शब्द ब्राह्मण्याच्या अहंगंडाने ओतप्रोत भरलेला आहे. त्या तक्रारीत सुवासिन असा शब्द त्या वारंवार वापरत आहेत. ब्राह्मणी धर्मानुसार स्त्रियांवर बंधने लादुन जातीव्यवस्थेचा किल्ला हा अधिकाधिक भक्कम केला गेला आहे. त्यासाठी जातीश्रेणी आणि स्त्रियांचा समाज व्यवस्थेतील दर्जा ठरविण्यासाठी त्यांचे वर्गीकरण विविध प्रकारे केले गेले अराहे. ते अत्यंत अपमाजनजनक, मानहानी करणारे असेच आहे. मनुस्मृतीत तर त्याचे हजारो दाखले सापडतात. स्त्रियांवर शूध्दी, पावित्र्याची मूल्यव्यवस्था निर्माण करत पुरुषांशिवाय त्यांचे स्वतंत्र अस्तित्वच नाकारण्यात आले आहे. पिता, पती, मुलगा यांच्या संरक्षण कक्षेत त्यांना बांधुन टाकले आहे. ही बंधने घट्ट आणि चिरकाल रहावीत यासाठी स्त्रियांची ‘सधवा‘, ‘विधवा’, ‘पतीव्रता’, ‘बाजारबसवी’, ‘कुमारीका’, ‘कुलटा’, ‘परित्यक्ता’ इ. विभागणी केली गेली. तिला ब्राह्मणी धर्माच्या मूल्यव्यवस्थेचा सोनेरी-चंदेरी मुलामा दिला गेला. परिणामी या गुलामीतच स्त्रियांना आपली ओळख, आपली अस्मिता आणि अस्तित्व आहे अशा संरचना उभ्या केल्या गेल्या.

–प्रतिमा परदेशी

पुणे हे नेहमीच चित्रविचित्र घटनांसाठी प्रसिद्ध राहिले आहे; खरेतर ब्राह्मणी-पुरुषसत्ताक घडामोडींचे ते माहेरघर आहे. अर्थात सनातन्यांची ती सांस्कृतिक राजधानी असल्याचा हा परिपाक आहे. अगदी १५-१६ व्या शतकापासून पुणे ही ‘सांस्कृतिक रणभूमी’ बनलेली आहे. जगद्गुरु तुकोबांच्या ज्ञानाचे भांडार असणाऱ्या गाथांना जलसमाधी देणारी मंबाजी भटारुपी सनातनी प्रवृत्तीने ज्ञानाचे क्षेत्र ‘सोवळं’ ठेवण्याचा प्रयत्न केला होता. १९ व्या शतकात सत्यशोधक चळवळीने ब्राह्मणी-पुरुषसत्ताक वर्चस्ववादाविरोधात सत्यधर्माच्या बंडाचे निशाण फडकविल्यावर सनातन्यांचे पित्त खवळले आणि जोतीराव फुल्यांवर मारेकरी पाठविले गेले. सावित्रीबाई फुल्यांनी ज्ञानाची कवाडं समस्त स्त्रियांना उघडून देण्यासाठी संघर्ष केला तेव्हा त्यांच्या अंगावर शेण-दगडांचा मारा करण्यात आला. ज्ञानाच्या क्षेत्रात दलित-बहुजन-अल्पसंख्यांकाचा प्रवेश त्यांना असहाय्य वाटत आला आहे. कारण त्यावर वर्चस्व आणि मक्तेदारी ठेवुन समाजावर प्रभुत्व गाजवण्याचा तो एक भाग होता आणि आहे. या क्षेत्राला ते ‘सोवळ्या’ चा प्रदेश मानतात.  सोवळ्याला धक्का बसायला सुरुवात झाली की पुणे सांस्कृतिक रणभूमी बनवले गेले आहे. मग मंबाजी जन्माला येतो, ज्ञानाच्या किल्ल्या आमच्याच जानव्याला असल्याची दर्पोक्ती करणारे चिपळूणकर जन्मतात. या सर्व सोवळा व्यवहार आठवण्यामागचं कारण म्हणजे ६ सप्टेबर २१०७ या दिवशी पुणे पुन्हा एकदा सांस्कृतिक रणभूमी बनले आहे. निमित्त आहे ते मेधा खोले यांनी निर्मला यादव यांच्याविरोधात सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या फिर्यादीचं.

ज्या पुण्यात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी आपल्या राहत्या घरी स्त्रियांचा हळदी-कुंकवाचा सभारंभ आयोजित केला होता. तो विशेष स्वरुपाचा, महत्वाचा होता कारण या कार्यक्रमाला येण्यासाठीचे निमंत्रण एक नोटीस फिरवुन सर्व स्त्रियांना देण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष धर्माने ख्रिस्ती असणाºया महिला भूषविणार असून आपण सर्व भगिनीनींनी एका जाजमावर (सतरंजी) बसुन कार्यक्रम होईल असा नोटीशीचा भावार्थ होता. सत्यशोधक भगिनीभावाची बीजे, या तिळगुळ सभारंभातु, सर्व जातीतील मुलींना शिक्षण देण्यातुन, फातिमाबींच्या घट्ट मैत्रितुन, मुक्ताबाई मांगवरील मायेतुन सावित्रीबाई फुले यांनी रुजविली ती याच पुण्यात, जिथे आज सत्यशोधक भगिनीभावाला अव्हेरुन सनातनी व्यवहार खुलेआम एक स्त्री दुसºया अर्थात परजातीतील स्त्रीबद्दल करताना फक्त पुणंच नाही उभा महाराष्ट बघत आहे.

मेधा खोले या कोणी सर्वसाधारण स्त्री नाही, तर त्या पुण्यातील हवामान भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या संचालक म्हणून कार्यरत आहेत. भारतातील मान्सूनवर होणाऱ्या परिणामांच्या अभ्यासातील त्या तज्ञ मानल्या जातात. पर्यावरण, मान्सून यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास त्यांनी इतका इतर समाजापासून दूर घेऊन गेला की आपल्याला सेवा देणाऱ्या एका स्त्रीला अपमानित केले तर तिच्या मनावर काय परिणाम होईल याची अजिबात तमा त्यांना वाटली नाही. ही असह्रदयता येते कोठुन? ती येते जाती अहंकारातुन, अहंगंडातुन. सर्व स्त्रिया सारख्याप्रमाणात शोषित नसतात हा म. फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सिध्दांत मेधा खोलेंच्या वर्तनातुन पुनर्प्रतित झाला आहे. कुळंबिण अखंडात म. फुल्यांनी  भटीण स्त्रिया   आणि कुणबा करणाऱ्या स्त्रियांचे दुख भिन्न असल्याचे म्हंटले होते. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील जाती या निबंधात प्रामुख्याने श्रेणबध्द विषमता असणाऱ्या जातीच्या सापानात्मक संरचनेमुळे होणारे स्त्रियांचे शोषणही श्रेणींनुसार तीव्रतर होते हे महत्वाचे सिध्दांतन केले होते.

मेधा खोले आणि निर्मला यादव या दोन व्यक्तितील हे भांडण नाही तर दोन भिन्न जातीच्या श्रेणींमध्ये विभागल्या गेलेल्या स्त्रियांचे वैचारिक युध्द आहे. निर्मला यादव यांच्याविरोधात पोलीस फिर्याद (- गुन्हा रजिस्टर नं. व कलम २८६/२०१७ भा.द.वी.४१९,३५२,५०४ ) देताना खोलेबार्इंनी असे म्हटले आहे की, महिला नामे निर्मला यादव हिने तिचे नाव निर्मला कुलकर्णी असे असून ती सुवासिनी व जातीने ब्राह्मण असल्याची तोतयागिरी करून आमच्या घरी सोवळ्याच्या स्वयंपाकाचे काम करून त्या बदल्यात १५ ते २० हजार रूपयाचा मोबदला आमच्याकडुन स्वीकारून आमच्या धार्मिक भावनांना धक्का पोहचवुन आमची फसवणुक केली. तसेच दि. ६-९-२०१७ रोजी मी निर्मला यादव यांना माझी फसवणुक केली बाबतचा जाब विचारण्यासाठी त्यांचे राहते घरी गेले असता त्यांनी माझ्या अंगावर धावुन येवुन मला वाईट शिवीगाळ केली म्हणून माझी सदर महिलेविरुध्द तक्रार आहे. अशी तक्रार नोंदविली आहे. या तक्रारीवरुन पोलीसांनी निर्मला यादव यांच्यावर कलम ४१९- फसवणुक करणे, ३५२-हल्ला करणे, ५०४ धमकी देणे अशी कलमे लावुन निर्मला यादव यांच्यावर गुन्हा नोंदविला  आहे. खोलेबार्इंची मुख्य तक्रार ङ्कसोवळंङ्ख बाटवण अशीच आहे. ब्राह्मण असल्याचा बनाव करण याचा राग, विधवा असताना सवासणं म्हणून सांगण्याचा राग आणि  सोवळ्यातील स्वयंपाक करून  धार्मिक भावना   दुखावल्या गेल्याचा गंभीर आरोप त्यांनी यादवबार्इंवर केला आहे.

या संदर्भात काही महत्वाचे, गंभीर असे प्रश्न उभे राहतात. ‘सोवळ्याला’च्या स्वयंपाकासाठी यादवबाई खोलेंच्या घरी गेल्या नव्हत्या. त्यांनी हे स्वयंपाकाचे काम जोशी नावाच्या मध्यस्थ पुरुषाने मिळवुन दिले होते. त्यासंदर्भातील सर्व चर्चा जोशी आणि खोले या दोन ब्राह्मण व्यक्तिंमध्येच झाली होती. यादवबार्इंबद्दल जोशींनी नेमकी काय माहिती दिली हे यादवबार्इंना माहित नव्हते. एखादे स्वंपाकाचे काम घेताना सर्वसाधारणत सर्वसामन्य लोक किती माणसांचा स्वयंपाक करायचा आहे, कोणत्या प्रकारचा स्वयंपाक करायचा आहे आणि मोबदला किती देणार? याचीच बोलणी करतात. त्यामुळे यादवबार्इंना   जोशी-खोले यांच्यात अशीच चर्चा झाली असणार असे वाटणे स्वाभाविक आहे. त्या मराठा जातीतील हिंदु स्त्रीला ‘सोवळ्यातला’ स्वयंपाक, त्यामागील विचारधार काय माहित असणार? खोलेबार्इंकडे यादवबाई  २०१६ पासून स्वयंपाकाचे काम करत होत्या. २०१७ च्या सप्टेंबर महिन्यात जोशी-खोले संबंध बिघडले आणि बळीचा बकरा ठरल्या त्या यादवबाई. या प्रकरणातील वस्तुस्थिती अशी आहे की, जोशींनी खोलेबार्इंना निर्मलाबाई ब्राह्मण आणि  सधवा असल्याचे सांगितले होते. आर्थिक हितसंबंध ब्राह्मण माणसाला कोणत्या थराला आणू शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे जोशीबुवा! कलम ४१९ नुसार फसवणुक करणे हा गंभीर आरोप निर्मला बार्इंवर खोलेबार्इंनी लावला आहे, परंतु कळीचा नारद तर जोशीबुवा आहे. वास्तविक यादवबाई ब्राह्मण नसुन मराठा असल्याची माहिती खोलाबार्इंना त्यांनीच तर दिली होती. खोलेबार्इंची खरीच फसवणुक झाली अशी धारणा असेल तर त्यांनी यादवबार्इंऐवजी जोशीबुवांवर दावा ठोकला पाहिजे होता; परंतु ब्राह्मणी ऐक्य असे करण्यापासून त्यांना परावृत्त करते. निर्मला यादव या ब्राह्मणी धर्मानुसार कनिष्ठ जातीतील स्त्री. तिला ना प्रतिष्ठा ना पत या ब्राह्मणी संस्कारातुनच त्यांनी निर्मलाबार्इंना धारेवर धरले होते.

खोले बार्इंच्या तक्रारीतील शब्दन्शब्द ब्राह्मण्याच्या अहंगंडाने ओतप्रोत भरलेला आहे. त्या तक्रारीत सुवासिन असा शब्द त्या वारंवार वापरत आहेत. ब्राह्मणी धर्मानुसार स्त्रियांवर बंधने लादुन जातीव्यवस्थेचा किल्ला हा अधिकाधिक भक्कम केला गेला आहे. त्यासाठी जातीश्रेणी आणि स्त्रियांचा समाज व्यवस्थेतील दर्जा ठरविण्यासाठी त्यांचे वर्गीकरण विविध प्रकारे केले गेले अराहे. ते अत्यंत अपमाजनजनक, मानहानी करणारे असेच आहे. मनुस्मृतीत तर त्याचे हजारो दाखले सापडतात. स्त्रियांवर शूध्दी, पावित्र्याची मूल्यव्यवस्था निर्माण करत पुरुषांशिवाय त्यांचे स्वतंत्र अस्तित्वच नाकारण्यात आले आहे. पिता, पती, मुलगा यांच्या संरक्षण कक्षेत त्यांना बांधुन टाकले आहे. ही बंधने घट्ट आणि चिरकाल रहावीत यासाठी स्त्रियांची ‘सधवा‘, ‘विधवा’, ‘पतीव्रता’, ‘बाजारबसवी’, ‘कुमारीका’, ‘कुलटा’, ‘परित्यक्ता’ इ. विभागणी केली गेली. तिला ब्राह्मणी धर्माच्या मूल्यव्यवस्थेचा सोनेरी-चंदेरी मुलामा दिला गेला. परिणामी या गुलामीतच स्त्रियांना आपली ओळख, आपली अस्मिता आणि अस्तित्व आहे अशा संरचना उभ्या केल्या गेल्या. या मुल्यांचा जाणीवा-नेणीवांच्या परिणामी खोलेबार्इंमध्येही ब्राह्मणी-पुरषी अहंगड ओतप्रोत भरलेले दिसतात. या कुसंस्कारांमुळेच त्यांना सोवळ्यातील स्वयंपाकासाठी ब्राह्मण स्त्रीच हवी आणि तिही सधवा म्हणजे पोलीस तक्रारीत लिहिलेल्या शब्दानुसार सुवासिनी असायला हवी असे वाटते. भारतातील जातीपुरूषसत्ताकता भगिनीभावाला अडसर निर्माण करते. एक उच्चशिक्षित, उच्चपदस्थ परंतु उच्चजातीतील स्त्री कनिष्ठ जातीय स्त्रीशी सहवेदना व्यक्त करताना तर दिसत नाहीच उलट तिच्या सधवा-विधवा इ. इ. असल्यामुळे, जातीश्रेणीरचनेत कनिष्ठ श्रेणीवर असल्यामुळे एका मराठा जातीतील स्त्रीचा र्साजनिक अपमान करण्यास त्या अजिबात कचरत नाहीत. उलट पोलीस तक्रार दाखल झालीच पाहीजे यासाठी आग्रही राहतात. याला ब्राह्मणी किंवा खोलेबार्इंच्या केसमध्ये म्हणतात ‘सोवळा जातीयवाद!’

या सोवळ्या जातीयवादाकडे समाजातील मूखंडांनी, विविध संघटना-प्रवाहांनी वेगवेगळ्या पध्दतीने पाहिले आहे, तसे विश्लेषण केले जात आहे. काहींनी निर्मलाबार्इंना पाठिंबा दिला तो घरकामगार स्त्री म्हणून तर काहींनी स्वजातीय स्त्रीचा झालेला अपमान सहन न झाल्यामुळे, काही अतिक्रांतिकारकांनी अनाहूत जातजाणीवेनुरुप सल्ले दिले, काहींनी हा आपला प्रश्न नाही – ज्याचा असेल तो बघेल… या प्रतिक्रियांमध्ये काही भडक व कडक भाषाही वापरली गेली. खोलेबार्इंचे अविवाहितपण अधोरेखित केले गेले. परंतु कुणीही शिवीगाळ, गलिच्छ भाषेचा किंवा शब्दांचा वापर केलेला दिसला नाही. हे चांगले झाले. तरीही काहींनी स्त्रियांबद्दल नीट भाषा वापरावी… असे सल्ले दिलेच. अर्थात त्याचे स्वागतच. कारण या जातीपुरुषसत्ताक समाजात चिड, संताप व्यक्त होताना जातींचा अवमानकरक किंवा  स्त्रियांचा निंदाजनक उल्लेख होण्याचा धोका असतोच. परंतु ही चार्चा समाजमाध्यमांमध्ये वाचताना आज हा मुद्दा उपस्थित करणाºयांनी जेम्सलेन प्रकरणात निर्माण झालेल्या जिजाबार्इंच्या चारित्र्यहननाबाबत ब्र  ही का उच्चारला नव्हता अशा प्रश्न मनात आलाच. सर्व स्त्रीसंघटनांची उदासिनताही बरीच बोलकी आहे. निलम गोऱ्हे यांच्या संदर्भात एका दलित कार्यकर्त्याने अपशब्द वापरला तेव्हा स्त्रीमुक्ती संघटनांनी टिकेची झोड उठवली होती. पत्रकबाजीही केली होती. ते बरोबर होते. परंतु तीच तत्परता आणि तडफ निर्मला यादव यांच्याबाबतीत दिसली नाही हेही तितकेच खरे!

या सर्व प्रकरणात स्वतला हिंदुत्ववादी म्हणवुन घेणाºया संघटनाचे पुरषी राजकारणही लक्षात घ्यायला हवे. काहींनी संविधानातील कलम १९ नुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला धार्मिक स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार आहे. मेधा खोलेंना सोवळ्यात स्वयंपाक करुन घेण्याचा अधिकार असल्याचेही त्यांनी म्हंटले. या प्रकरणात प्रश्न केवळ धार्मिक स्वातंत्र्याचा नाही. खोलेबार्इंनी स्वत सोवळ्यात स्वयंपाक करणे, गणपती-गौरी पूजन करणे हे त्यांचे धार्मिक स्वातंत्र्य आहे; परंतु निर्मलाबार्इंकडून मोलाने – पैसा देण्याचा करार करुन करुन घेतलेले काम सार्वजनिक स्वरुपाचे आहे. येथे व्यक्तिगत धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा संपतो. निर्मलाबार्इंचा केलेला जाती अपमान म्हणूनच निंदनीय आहे. तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी याही प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे,की मेधा खोले धार्मिक भावनांना धक्का पोहचविला असल्याची तक्रार केली आहे. खोलेबार्इंच्या धार्मिक भावना आणि निर्मलाबार्इंच्या धार्मिक भावना एक नाहित, हे यातुन स्पष्ट होते. खोलेबार्इंनी आपली फिर्याद मांडताना खोलेबाई आणि त्यांच्यात झालेलली   बाचाबाची माध्यमांच्या प्रतिनिधीं पुढेही मांडली आहे. त्यात त्या म्हणतात, खंडोबा, म्हसोबा  तुझे रस्त्यावरचे देव आहेत, तुला काय कळणार सोवळओवळं….अशी भाषा वापरली. खोलेबार्इंनी बहुजनांचा धर्म आणि ब्राह्मणी धर्म यातील भेद रागारागात का होईना जगापुढे आजच्या काळात मांडला हे बरेच झाले. मात्र हिंदु धर्माच्या चिकित्सेचा मुद्दा या निमित्ताने पुढे येईल याच भितीने या सर्व स्वघोषित हिंदुत्ववादी संघटनांनी निर्मलाबार्इंची घाईघाईने भेट घेतली. मोरेश्वर घैसास यांच्यापासून दवेंपर्यंत सर्वांचे म्हणणे एकसूत्री होते-जातीय अथवा धार्मिक तेढ निर्माण होण्याच्या दृष्टीने केलेला हा कांगावा आयोग्य आहे. एका बहुजन स्त्रीचा ब्राह्मणी मूल्यकल्पनांमुळे झालेला अपमान हा मुद्दा पडद्या आड फेकुन ब्राह्मणी पुरुषांनी तो धार्मिक प्रश्न बनवला. पुढे जाऊन खोलेबार्इंना हिंदुंमध्ये फुट पडू नये यासाठी पोलीस तक्रार मागे घ्या असा सल्लाही दिला आहे. खोलेबार्इंनी दि. ९ सप्टेंबरला निर्मलाबार्इंच्या विरोधात पोलीसात केलेली तक्रार माघे घेतली आहे. ब्राह्मणी सोवळी ब्रह्म युती आधोरेखित झाली आहे आणि ती पुरेशी बोलकी आहे.

लेखिका अब्राह्मणी स्त्रीवादाच्या पुस्कर्त्या आहेत. राज्यशास्त्राच्या प्राध्यापक असून सत्यशोधक कम्युनिस्ट चळवळीत त्यांचे सक्रिय योगदान आहे.

2 Comments

  1. vijay b sanadi Reply

    आपण ” सोवळे ” या प्रकरणाचे स्पष्ट व निर्भीड तेने खुलासा केलात
    . . . . धन्यवाद

  2. सूर्यभान झाडे Reply

    प्रतिमा मॅडम ,खोले बाई सुद्धा मनुस्मृतीनुसार शूद्र आहेत ,हे त्यांना माहित नाही काय ?

Reply To सूर्यभान झाडे Cancel Reply