fbpx
कला

कालाच्या निमित्ताने ब्राम्हणवादी, शोषका विरूध्द दलित, श्रमिक व शोषितांचा लढा

मेरी जमिन मेरे अधिकार को ही छीनना अगर तेरा

और तेरे भगवान का धर्म है ,,…

तो में तुझे और तेरे भगवान को भी नही छोडुंगा !!!!

– काला

मी चित्रपटाचा फारसा शैाकीन नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटगॄहात जाऊन चित्रपट पाहणे झाले नाही. अगदी एखादया मित्राने चित्रपट पाहण्याचा आग्रह केला तरी मी त्यात काही रस दाखवला नाही. माझी मुलं टी.व्ही.वर चित्रपट लावतात तेव्हा कधी नाइलजाने तर कधी विरंगुळा म्हणुन बरेचसे चित्रपट पाहीले जातात, त्या पैकी बऱ्याचदा पाहत असलेला चित्रपट कोणता आहे, त्याचे नाव काय आहे, याची कल्पनाही नसते. माझा मुलगा दाक्षिणात्य शाळेत शिकत असल्यामुळे म्हणा किंवा टि.व्ही.वर सातत्याने हिंदी मध्ये डब केलेल्या दािक्षणात्य चित्रपटांची रेलचेल असल्याने अनेकदा ही चित्रपट बघत असतो. त्यामुळे मलाही अनेक दािक्षणात्य चित्रपट टी.व्ही.वर बघता आले. हिंदी चित्रपटाच्या तुलनेत दािक्षणात्य चित्रपटाचे कथानक हे अतिशय वेगवान असते, तसेच यातील नायक हा लार्जर दॅन लाईफ असतो. हा नायक अन्याया विरूध्द लढताना एकाच वेळी अनेक लोकांशी यशस्वीरीत्या लढु शकतो तसेच, स्वत: निशस्त्र असताना व विरूध्द खलनायकाकडे व त्याच्या लोकांकडे अत्याधुिनक शस्त्रास्त्रे असताना देखिल त्यांच्या विरूध्द अनाकलनीय असे स्टंट करून या खलनायक व त्याच्या गँगचा पाडाव करू शकतो.
दाक्षिणात्य लोकांच्या जिवनात या फिल्मी नायकांना अनन्य साधारण असे महत्व आहे. या फिल्मी नायकांना त्यांनी देवत्व प्राप्त करून दिलेले आहे. ही
परंपरा एनटीआर, एमजीआर पासुन जयलिलता ते कमलहसन रजनीकांत पर्यंत अथक सुरू आहे. जयललिताचे तिच्या हयातीतच मंदीर बांधण्यापर्यंत तिच्या चाहत्यांची मजल गेलेली आहे.
अलिकडेच रजनीकांत या महानायकाचा काला हा चित्रपट पाहण्याचा योग आला. या चित्रपटाचा दिग्दर्शक पा.रंजित व रजनीकांत या जोडगोळीचा कबाली हा चित्रपट नुकताच येऊन गेला. पा.रंजित हा दिक्षणेकडील आंबेडकरवादी दलित असुन तो सध्याच्या घडीला एक आघाडीचा दिग्दर्शक म्हणुन गणला जातो. कबाली या चित्रपटात महानायक रजनीकांतने आंबेडकरवादी विद्रोही दलित नायकाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने निव्वळ दक्षिणेतच नाही तर संपूर्ण- भारतभरातच व आंतरराष्ट्र्रीय पातळीवर ब्लॉकबस्टर श्रेणतील कमाई केलेली आहे. या चित्रपटाने प्रदर्शनापुर्वीच २०० कोटी रूपयांची कमाइ- केल्याचे म्हटले जाते.
काला चित्रपटाचे कथानक जमीनीवरील हक्काकरीता प्रस्थापितां विरेाधात विस्थापितांची लढाई या विषयावर आधारीत आहे. विषयाचा आवाका मोठा असला तरी या कथानकाचा जीव फार नाही. मात्र तरीही चित्रपटाचा दिग्दर्शक पा. रंजित त्याने चित्रपटात वापरलेल्या पात्रांच्या नावावरून, प्रतिकांवरून, रंगसंगतीवरून व संवांदा वरून अनेक संदेश देतो. यातील प्रत्येक पात्राचे नाव स्पष्टपणे राजकीय सामाजिक संदेश देतात. मनु रियल्टी हे मनुवादाचे प्रतिक आहे. तर अभ्यंकर हे नाव बाम्हणवादाचे प्रतिक आहे तर अभ्यंकरच्या तोंडी सातत्याने असलेले बॉर्न- टु रूल हे वाक्य अभ्यंकरची ब्राम्हण्यदी विचारसरणी स्पष्ट करते. कालाच्या लहान मुलाचे नाव लेनिन हे साम्यवादी विचारसरणी प्रतित करते. मात्र त्याच्या चित्रपटातील संपुर्ण वर्तणुकीवरून त्याच्या भावना कितीही चांगल्या असल्या तरी तो वास्तवा पासुन दुर असुन हतबल असल्याचे दिग्दर्शकाला सुचवायचे आहे असे वाटते. काला हे नाव मजदुर श्रमिकाचे प्रतिक आहे. पेरीयार स्वामींचे समर्थक काळ्या रंगाचा पेहेराव करतात. कालाची प्रेयसी झरीना असणे व त्यांच्या प्रेम सबंधांना दोघांच्या कुटुिबयांची मान्यता असणे हे, दलित मुसलमान यांच्यातील सहजीवनाचे प्रतिक आहे. चित्रपटात काला राहतो ते ठिकाण भिमवाडा असणे त्या ठिकाणी बुध्द विहार तसेच फुले शाहु आंबेडकर पेरीयार यांच्या प्रतिमा दिसतात तर जयभिम चा उदघेाष ही होताना दिसतो. एकदा काला, अभ्यंकरने सहमती करीता बोलावल्यामुळे त्याच्या घरी गेलेला असताना अभ्यंकरची नात त्याला विचारते हा इसम कोण आहे त्यावर अभ्यंकर कालाची ओळख रावण अशी करून देतो. या प्रसंगातुन ब्राम्हणवादी व्यवस्था दलित, शोषितांना व त्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्यांना रावण संबोिधत असते.त्यामुळे ही राम विरूध्द रावण या प्रतिकांची लढाई आहे. यातील बहुजनांकरीता कोण नायक व कोण खलनायक हे दिग्दर्शक परखडपणे दाखवतो.

अनादी काळापासून जमीन व त्यावरील हक्काकरीता लढाया होत आलेल्या आहेत. त्यातुनच जो जिंकतो तो त्या जमिनीवर हक्क सांगतो, तर हारणाऱ्याला गुलाम व्हावे लागत असते. या चित्रपटाचे कथानक आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपटटी म्हणुन गणली जाणारी, मुंबईतील धारावी येथील आहे. धारावीची ही झोपडपटटी दलित शोषित श्रमिकांची वसाहत म्हणून ओळखली जाते. गावाकडुन जगण्याकरीता नोकरीधंदया निमत्ताने दलित शोषित मजुर येथे येउन स्थाइक झाला. हा समाज अत्यंत निकृष्ट असे हीन पातळीवरचे जिवन जगत असतो, दहा बाय दहाच्या छोटयाश्या खोलित दहा बारा जणांचे कुटूंब कसे बसे आपले जिवन कंठत असतात. त्यांना शौचालयापासुन पाण्याकरीता जिवाचा आटािपटा करावा लागत असतो. काही लोकांचे या राहत्या ठिकाणीच छोटे मोठे व्यवसाय आहेत. यात चामडयाच्या व्यवसायापासुन धेाबी घाटापासुन ते कुंभारा पर्यंतचे अनेक असे व्यवसाय आहेत. या मुंबई शहराच्या उभारणीत या समाजाचा फार मोठा वाटा आहे. एवढेच नाही तर या शहराचे चलनवलन या दलित जातीतील व कामगार वर्गातील समाजावरच अवलंबुन आहे. या समाजाशिवाय देशाची आर्थिक राजधानीचे बिरुद मिरवणाऱ्या या धन्नाशेठांची ही मुंबई चालू शकत नाही, या बाबी चित्रपटात दिग्दर्शकाने खुबीने मांडल्या आहेत. अशा या गलिच्छ वसाहतीच्या बाजुलाच बांद्रा कुला- कॉम्पलेक्स या कॉर्पोरेट वसाहतीची उभारणी झाल्यामूळे सोन्यापेक्षा जास्तीचा भाव आलेला आहे. त्यामुळे या जमिनीवरील लोकांना चांगल्या घराचे स्वप्न दाखवून त्यांना त्यांचे जगण्याचे व्यवसाय घालवून, कायमचे विस्थापत करून या जमिनीच्या विकासातुन मनु रियल्टीचा मालक असलेल्या अभ्यंकर नावाच्या विकासकाला बक्कळ नफा कमवायचा आहे.या अभ्यंकर पात्राची भुमिका नाना पाटेकरने यशस्वीरीत्या साकारली आहे. जमिनीचा विकास करून बक्कळ नफा करण्याचे त्याचे स्वप्न आहे.हे स्वप्न पूर्ण करण्याकरीता वाटेल ते करावयाची त्याची तयारी आहे. अभ्यंकरचे हे स्वप्न पुर्ण करण्याच्या आड या चित्रपटाचा महानायक रजनीकांत (काला) येतो.

मनू रियाल्टी त्याचा मालक अभ्यंकर यातून लेखक दिग्दर्शकाला या देशातील शोषणाची प्रक्रिया ही जात वर्गीय असल्याचे ठोस विधान करायचे आहे हे स्पष्ट होते. अशी सुस्पष्टता यापूर्वी कुठल्याही व्यावसायिक सिनेमात दिसलेली नाही. काला या वसाहतीत अत्यंत महत्वाचा व्यक्ती असतो, त्याला लोकांचा फार मेाठा पाठिंबा असतो. येथुनच संघर्षाला सुरूवात होते, किंबहुना हा संघर्ष तसा जुनाच आहे याच संघर्षातुन कालाचे वडील व्यंकय्या यांचा बळी गेलेला आहे. कालाची प्रेयसी झरीना हिच्याबरोबर कालाचे लग्न होत असताना या लग्नातच या अभ्यंकरच्या माणसांनी व्यंकय्याचा काटा काढलेला असतो. त्यातुनच झरीना विस्थापित होते व कर्म -धर्म – संयोगाने कोणाच्या तरी मदतीने तिला अमेरीकेत उच्च शिक्षण घेऊन व्यवसाया करीता आफ्रिकेत स्थायिक होण्याची संधी मिळते . या नंतर ती पुन्हा मुंबईत राहायला येते व आपण एकेकाळी रहात असलेल्या गलिच्छ वसाहतीतील लोकांचे रहाणीमान उंचावण्याच्याउद्देश्याने एका स्वयंसवी संघटनेच्या माध्यमातुन या अभ्यंकरच्या विकासाच्या योजनेच्या गळाला लागते.तिचा उद्देश्य या विकासकाच्या माध्यमातुन विकास झाल्यास येथील लेाकांना चांगले जीवनमान, घरातच शौचालय पाणी तसेच वसाहतीतच शाळा कॉलेज, गार्डन इ.सुविधा मिळतील.या कामी तिला कालाचा लहान मुलगा लेनिन हा देिखल सहकार्य करण्याच्या भूमिकेत असतो त्याच्या मते आपला बाप हा अजुनही जुन्याच विचारात रममाण झालेला आहे या गलिच्छ वसाहतीतच त्यांना बरे वाटते विकास करण्याची त्याची मानसिकता नाही म्हणुनच तो आपल्या बापिवरूध्द व कुटुंबािवरूध्द बंडकरतो, घराबाहेर पडतो. झरीना व लेनिन या करीता अभ्यंकरची भेट घेऊन त्याला तुमच्या विकासाला आम्ही सहकार्य करून लोकांचे सहकार्य देखील मिळवुन देण्यात मदत करण्याचे वचन देतात.कालाचा मात्र अशाप्रकारच्या विकासाला विरोध असतो कारण या विकासातून अनेक राहत असलेल्या लोकांना अपात्र ठरवुन बेघर केले जाणार आहे तर अनेक लेाकांचे त्यांचे जगण्या करीता असलेले स्वत:चे व्यवसाय उध्वस्त होणार आहेत.कालातंराने झरीना व लेनिन या दोघांनाही आपण चुकीच्या माणसाच्या नादी लागल्याचे लक्षात येताच ते पुन्हा कालाला येऊन मिळतात.

अभ्यंकरचा धारावीतील त्याची विकास योजना पुढे नेणारा हस्तक विष्णु याची हत्या केल्या नंतर अभ्यंकर कालाच्या वसाहतीत त्याच्या घरी भेट
देण्याकरीता येतो व कालाला त्याच्याविकास योजनेस सहकार्य करावे अशी अप्रत्यक्षरीत्या धमकी व समज देतो. तेव्हा काला सांगतो तु मला भेटायला माझ्या परवानगी शिवाय आलेला आहेस मात्र माझ्या परवानगी शिवाय तु येथुन जाऊ शकत नाही व माझ्या परवानगी बगर तु धारावीतील दगड सुध्दा बाहेर नेऊ शकत नाही.कालाच्या या सल्ल्याकडे दुर्लक्ष्य करून अभ्यंकर त्याच्या आर्थिक, प्रशासनिक तसेच राजकीय सामर्थ्याच्या घमेंडीत वसाहतीतुन त्याच्या गाडीतुन बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो, मात्र तो बाहेर पडताच तेिथल लेाकांनी सर्व रस्ते विविध मार्गांचा अवलंब करून जाम केलेले असतात.अभ्यंकरला त्याची गाडी व त्याच्या सोबतच्या लवाजम्याला देखील दोन फुट सुध्दा पुढे जावयाला जागा ठेवलेली नसते.हे बघुन अभ्यंकराचा एक सहकारी या लेाकांवर गोळीबार करावा का अशी अभ्यंकरला विचारणा करतो. त्यावर अभ्यंकर परिस्थितीचे भान ठेऊन त्याच्या सहकार्याला तुझ्या कडे या लेाकांना मारण्या करीता ईतक्या गोळया आहेत का अशी विचारणा करून, परत जाण्याकरीता गाडीतुन उतरून कालाची परवानगी घेण्याकरीता जातो. या प्रसंगावरून शोषक कीतीही ताकतवर असला तरी शोषितांची अभेद्दय संघटीत शक्ती त्याला हतबल करू शकते.ही बाब दिग्दर्शकाने वारंवार वेगवेगळया प्रसंगातुन दाखिवण्याचा प्रयत्न केलेला आहे.

अभ्यंकर त्याच्या राजकीय व प्रशासनातील सामर्थ्याचा उपयोग करून पोलिसांच्या मदतीने कालाला अटक करतो व येथेच कालाचा खुन करण्याची योजना करतो तेव्हा या अटकेची बातमी तेथील एक पोलीस, ज्याचे नाव शिवाजी गायकवाड असे दाखिवण्यात आलेले आहे, जे राजनीकांतचे प्रत्यक्ष जीवनातील नाव आहे. तो पोलीस कालाच्या मुलाला येऊन ही बातमी सांगतो मात्र, कालाला सोडण्याच्या मागणीकरीता सर्व धारावीतील जनता पोलीस स्टेशन बाहेर येऊन पोलीस स्टेशनला घेराव करतात. एवढेच नाही तर, सर्व शहरात या अटकेविरोधात सफाई कामगार, टॅक्सी चालक, अनेक मजुर संप पुकारतात. सर्वहारा जेव्हा व्यवस्थेसमोर उभा राहतो तेव्हा प्रचंड शक्तीशाली व्यवस्थेला झुकावेच लागते… मुंबई चालती ठेवणाऱ्या सा वर्गाच्या प्रचंड दबावाखाली अभ्यंकरला म्हणजेच ब्राह्मणी भांडवली सत्तेला अभ्यंकरच्या हातात असलेल्या पोलीस नामक शासन यंत्रणेला परिस्थिती लक्षात घेऊन कालाला सोडण्याचा निर्णय घ्यावा लागतो. मात्र या नंतरही अभ्यंकर माघार घेत नाही. काला व त्याची पत्नी त्याच्या गाडीने घरी जात असताना, अभ्यंकर त्याच्या माणसामार्फत कालाच्या गाडीवर भरधाव ट्रक घालतो. या अक्सिडेंट मध्ये कालाची पत्नी व मोठा मुलगा यांचा अंत होतो. काला मात्र या हल्ल्यातुन वाचतो .या हल्ल्यातुन वाचल्यानंतर काला अभ्यंकरला भेटण्याकरीता त्याच्या घरी जातो. अभ्यंकरला वाटते झालेल्या हल्ल्यामुळे काला पराभुत मनाने हार माणण्या करीता व त्याच्या भेटीकरीता आलेला आहे. त्यामुळे तो कालाला भेटण्याची परवानगी देतो. या भेटीचे चित्रीकरण व या दोघांमधील संवाद अत्यंत अर्थपूर्ण झालेला आहे.अभ्यंकर या वेळी कालाला सांगतो तुझी माझ्या घरात येण्याची औकात नाही परंतु नकळत अनवधानाने तुझ्या पत्नी व मुलाची हत्या झाल्यामुळे मी तुला येथे माझ्या घरी भेट देत आहे.असे बोलुन अभ्यंकर कालाला त्याच्या पत्नी व मुलाच्या मॄत्यबाबत दिलगिरी व्यक्त करतो. मला तुला मारायचे होते, त्यांना मारायचे नव्हते,असेही सांगतो. आता जे झाले ते विसरून जा, माझे पाय धर, मी तुला माफ करायला तयार आहे. असे समजावतो. पाया पडणे हे गुलामीचे लक्षण आहे तर, हात मिळवणे हे समानतेचे, मी काही तुझ्याकडे माफी मागायला आलेा नाही माझा विरोध कायम आहे. मेरी जीवन व मेरे अधिकार को ही छीनना अगर तेरा धर्म है, और तेरे भगवान का धर्म है ,,… में तुझे और तेरे भगवान को भी नही छोडुंगा असे काला अभ्यंकरला सुनावतो. ब्राह्मणी अधिसत्तेला अशा प्रकारे व्यावसायिक सिनेमातून विरोध दर्शवणारा काला हा बहुदा पहिलाच सिनेमा असावा.

या नंतर अभ्यंकरला त्याचे राजकीय वजनामुळे व त्याच्या बाजुचे सरकार निवडून आलेले असल्याने शासना कडुनच परवानगी मिळते तेव्हा अभ्यंकरच्या घरी पुजे निमित्त रामायणाचा पाठ सुरू असतो व राम रावणाच्या वधाचे वर्णन सरू असते, तर तिकडे अभ्यंकरची माणसे संपूर्ण धारावीला आग लावून कालाला संपवण्यात यशस्वी होत असतात.द्वीज आर्यांच्या रामायणाला अनार्य शूद्रांच्या जाणिवा कशाप्रकारे समजून घेतात याचे हे प्रतिक फारच सशक्त आहे. रामायणातील हा सत्ता संघर्ष आधुनिक युगातही सुरूच असल्याचे दिग्दर्शकाला यातून सुचवायचे आहे. कालावर शेवटची गोळी झाडणाराही दलितच दाखिवण्यात आलेला आहे. खरे तर चित्रपट येथेच संपलेला आहे. परंतु अशा प्रकारे शेवट दाखिवल्यास व दिक्षणे कडील देवत्व प्राप्त केलेल्या महानायकाचा मॄत्यु दाखिवल्यास त्याच्या चाहत्यांना ते आवडणार नाही. त्यामूळे या चित्रपटाचा शेवट कारणाशिवाय वाढविण्यात आल्यासारखा वाटतो ज्या मध्ये अभ्यंकर त्याच्या पुनर्विकास योजनेचे भूमिपूजन करत असताना अचानक काला पुनर्जीवित होतो व अभ्यंकरचा खातमा करतो व संपूर्ण स्क्रीनवर काळया रंगाची उधळण होते नंतर लाल आणि निळ्या रंगात पडद्याचे पूर्ण अवकाश व्यापले जाते. येथील पुरोगामी, बहुजनवादी, आंबेडरवादी व डाव्या विचाराची चळवळ सांगणारा चित्रपट दुर्दैवाने येथील बहुजन नेतॄत्व व जनमानस पुरेसे जागॄत नसल्याने या चित्रपटाला मुंबईत तरी पुरेशी गर्दी झाली नाही आणि रेस थ्रीसारख्या टुकार सिनेमाच्या मक्तेदारीपायी अनेक चित्रपटगॄहातुन तो पहिल्या आठवडया नंतरच उतरिवण्यात आला.

दलित चळवळीतील कार्यकर्ते व राईट अँगल्सचे नियमित वाचक

1 Comment

Write A Comment