fbpx
राजकारण

केरळ : हिंसेचे व्याकरण

आमचे समाजवादी आणि आंबेडकरवादी मित्र, कम्युनिस्ट हे हिंसावादी आहेत असा प्रचार करायला आघाडीवर असतात. मध्यमवर्ग नेहमी शांततेच्या बाजूचा असतो, त्याचे पोटाचे प्रश्न सुटलेले असतात. त्यामुळे समाज परिवर्तन शांततेच्या मार्गाने व्हावे रक्त न सांडता व्हावे, मतपेटीतून व्हावे असे त्याला वाटत असते कारण त्याला समाज परिवर्तनाची फारशी निकड नसते. कामगार, आदिवासी, दलित समुहातील लोक जेव्हा मध्यम वर्गात जातात तेव्हा तेही याच विचारसरणीकडे वळतात. हाच वर्ग समाजवाद्यांचा आधारवर्ग आहे. “युरो – कम्युनिझम” चा हाच आधार वर्ग होता. दलितातून आलेल्या मध्यम वर्गाला तर आज जसा बौद्ध धर्माचा यासाठी आधार आहे तसाच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या काठमांडूच्या भाषणाचा आधार आहे. परंतु  बाबासाहेबानी बुद्धाच्या अहिंसेचा जो अर्थ लावला आहे या बद्दल काही बोलले जात नाही. बाबासाहेबांनी प्रतिकारशून्य अहिंसेची टिंगल केली आहे तशीच अतिरेकी अहिंसेचीपण टिंगल केलेली आहे. म. गांधी आणि जैन धर्माबाबत त्यांनी हि टिप्पणी केली आहे आणि बुद्धांच्या अहिंसेला शुराची अहिंसा असे म्हटले आहे, तुमच्या मनात हिंसेची भावना असता कामा नये परतू स्व-अस्तित्व धोक्यात आले तर स्व-रक्षणासाठी केलेली हिंसा… हिंसा ठरत नाही. मार्क्सवादाची हिंसेबद्दलची भावना या प्रकारची आहे. त्यामुळे कम्युनिस्ट जसे हिंसावादी नाहीत तसे अहिंसावादीही नाहीत. जो पर्यंत समाजातील परस्परविरोधी हितसंबंधांचा झगडा मिटत नाही तोपर्यंत हिंसेचे अस्तित्व संपुष्टात येणार नाही.

–सुभाष थोरात, राजीव देशपांडे

 

शत प्रतिशत भाजप आणि कॉग्रेसमुक्त भारत ही शहा-मोदींची tagline आहे. त्यासाठी अमित शहांनी देशभर दौरे केले आहेत. सनातन वैदिक संस्कृतीत अश्वमेध यज्ञ  करण्याची परंपरा होती. त्यासाठी जो घोडा सोडला जायचा तो ज्या राज्यात अडवला जाईल तेथे युद्ध करून ते राज्य जिंकायचे अशी सर्व राज्ये जिंकून अश्वमेध यज्ञ  संपन्न केला जात असे. अमित शहांचे वर्तन आणि दर्पोक्ती तशीच आहे. पण त्यांना माहित आहे कि भारतातील तीन राज्ये अशी आहेत कि तेथे भाजपला भीक घातली जाणार नाही. त्यांच्या केंद्र सरकारातील दहशतीला जुमानले जाणार नाही. उलट कडवा प्रतिकार केला जाईल. ही तीन राज्ये आहेत केरळ, त्रिपुरा आणि प.बंगाल.

प. बंगालमध्ये आज जरी तृणमूलचे राज्य असले व त्यांचे भाजप बरोबर अंतर्गत साटेलोटे असल्याचे आरोप होत असला तरी भाजप विरोधाची धार त्यांनी बोथट होऊ दिलेली नाही. शिवाय कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांची शक्ति तेथे टिकून आहे. त्यामुळे या तीन राज्यात त्यांची डाळ शिजणे अशक्य आहे. पण असे आहे म्हणूनच या तीन राज्यात केंद्रसत्तेच्या जोरावर  भाजपच्या विघटनवादी कारवाया सुरु आहेत. मुस्लीम द्वेषाचे राजकारण करून प्रसंगी दंगली घडवून आणून हिंदु मतांची बेगमी करणे हा भाजपचा निवडणूक पटर्न राहिला आहे. त्याला विकासाच्या जुमल्याची फोडणी देत आपले धर्मांध मनसुबे पुढे घेऊन जाणे ही  त्यांची रणनीती आहे. प. बंगालमध्ये दंगली घडवण्यात ते यशस्वी झाले आहेत. याचे कारण तृणमूल कॉंग्रेसला आपण मुस्लिमांचे तारणहार आहोत हे दाखवून द्यायचे आहे. मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळ जवळ २८ टक्के मुस्लीम लोकसंख्या प.बंगालमध्ये आहे. निवडणुकीत ते महत्वाचे आहे. तृणमूल या खेळात म्हणूनच सामील झालेली आहे. अर्थात ते पुढे त्यांना महागात पडणारच आहे, कारण संघ-भाजपचा हा विषवृक्ष अफवांवर वाढतो. आणि आत्ताच्या काळात अफवा पसरविणे हि एकदम सोपी गोष्ट झालेली आहे.

त्रिपुरात डाव्यांचे सरकार आहे आणि इतर कोणत्याही राज्यांपेक्षा तेथे खूपच चांगले काम चालू आहे. आदिवासीबहुल असलेले हे राज्य १०० टक्के साक्षर आहे. तेथेही भाजपा आदिवासी-बिगर आदिवासी असा वाद निर्माण करून त्याला खतपाणी घालून विघटनवादी, फुटीरतावादी शक्तींना मदत करीत आहे. पक्षहितासाठी देशहिताचा बळी देण्याची कॉंग्रेसची परंपरा भाजपने तंतोतंत उचलेली आहे. पंजाबमधील खलिस्तानवाद्याना कॉग्रेसने पक्षहितासाठी आधी पाठिबा दिला. त्यानंतर काय झाले हे सर्वाना माहित आहे. जम्मू आणि काश्मिर तर अशा पक्षहिती राजकारणाचे विदारक प्रतीक आहे.

तीन वर्षापूर्वी केंद्रात सत्तेवर आल्यापासून संघ-भाजपचे केरळवर लक्ष आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला धडा शिकवायला काही कारण सापडते आहे का याच्या प्रतीक्षेत ते आहेत. केरळमधील राजकीय हिंसेसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला जबाबदार धरून केला जाणारा अपप्रचार तर अनेक वर्षे सुरु आहे. पण केंद्रसत्तेच्या जोरावर त्याची काही तड लागते का असा प्रयत्न संघ-भाजपने सुरु केला आहे. अमित शहांचा दौरा आणि आता नुकताच भारताचे अर्थ आणि संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी ते जणू संघ-भाजपचे मंत्री असल्याच्या थाटात हत्या झालेल्या एका संघाच्या कार्यकर्त्याच्या घरी भेट दिली. त्यांना इतकेही तारतम्य नाही कि आपण भाजपचे नेते असलो तरी देशाचे अर्थ आणि संरक्षण मंत्री आहोत आणि या पदावर असताना आपली वागणूक समानतेची असली पाहिजे. संघाचे कार्यकर्ते जसे राजकीय हिंसेचे बळी आहेत तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आणि कॉंग्रेस पक्षाचेही कार्यकर्ते बळी  पडलेले आहेत. ही खुनी लढाई थांबावी व शांतता निर्माण व्हावी यासाठी मार्ग काढण्याचा प्रयत्न करायला हवा पण ते न करता आगीत तेल ओतण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे. अर्थात या सरकारचे पंतप्रधान मुस्लीम टोपी घालण्याचे साधे सौजन्य पाळण्यास तयार  नाहीत त्यांच्याकडून ‘सबका साथ, सबका विकास’ कसला होणार? उलट या घोषणेच्या आड कामगार, शेतकरी, दलित, मुस्लीम, आदिवासी,स्त्रिया, यांच्या विकासाला खीळ घालणारी धोरणेच ते घेत आहेत.

राजकीय हिंसा ही केवळ सर्वसाधारण हिंसा नाही. तिची निश्चित अशी राजकीय उद्दिष्ट्ये असतात.जात-वर्ग-धर्म-वंश-प्रांत-राज्य-देशांचे हितसंबंध दडलेले असतात, कधी प्रत्यक्षपणे  असतात तर कधी ते अप्रत्यक्षपणे. राजकीय हिंसा या हितसंबधांचे अपत्य असते आणि आजवरच्या मानवी इतिहासाचे परिशीलन केल्यास एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते कि, ही हिंसा सत्ताधारी वर्ग, शोषक वर्ग कष्टकरी जनतेवर, दलितांवर, आदिवासींवर स्त्रियांवर- शत्रूस्थानी मानलेल्या धार्मिक, वांशिक समूहांवर लादत असतो. अशा हिंसेची परिणीती प्रती हिंसेत होते आणि शोषक वर्गाविरोधात अस्तित्वात आलेली प्रतीहिंसा प्रतिकाराची, स्वत:चे अस्तित्व टिकविण्याची स्वतचे  हक्क शाबूत ठेवण्यासाठी केलेली हिंसा असते आणि त्यामुळेच ती नैतिक असते.

केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला संघ-भाजप हिंसेसाठी जबाबदार धरत आहे. पण कम्युनिस्टांनी हिंसा जर केली असेल तर ती प्रतिकाराची हिंसा आहे. कम्युनिस्टांना  नेस्तनाबूत करण्याच्या हेतूनेच संघ-भाजपने (त्यावेळी भाजप नव्हता, जनसंघ होता) १९६० पासूनच हिंसेचा आधार घेतलेला आहे. त्यांना अर्थातच मालक वर्गाचा आधार होता, कामगारांचे संप फोडण्यासाठी संघाने हिंसेचा आधार घेतला होता.

संघ-भाजपचा विचार करताना नेहमी धार्मिक-सांस्कृतिक अंगाने केला जातो. पण या बुरख्याआड दडलेली ही एक अव्वल दर्ज्याची फासिस्त संघटना आहे. तिचा कारभार अनेक मुखाने चालतो. ज्याचे संचलन संघ करतो. एकचालकानुवर्ती हा तर त्यांच्या संघटनेचा पाया आहे. ती राजकीय तर आहेच पण आर्थिक पातळीवर अत्यंत उजवी अमेरिकन साम्राज्यवादधार्जिणी शक्ति आहे. स्वदेशी जागरण मंच सारख्या स्वदेशीचा पुरस्कार करणाऱ्या संघटना ही धूळफेक आहे. संघ अमेरीकन साम्राज्यवादाचे आशिया खंडातील सर्वात विश्वासू बाळ आहे. त्यांचा समाजवादाला, रशियाला जो विरोध आहे तो या भूमिकेतून आहे. त्यामुळे जे कम्युनिस्टांशी आणि संघाशी संबंधित नाहीत त्यांना हे दोघेही हिंसक वाटतात. हिंसेचे वर्गीय स्वरूप त्यांच्या लक्षात येत नाही आणि कम्युनिस्ट तर हिंसेसाठी जगभर बदनाम आहेत कारण हिंसेकडे समाजातील अंतर्विरोध, वर्गविरोध, वेगवेगळ्या हितसंबंधांचे टकराव या पार्श्वभूमीवर पहिले जात नाही तर मानवतावादी, वर्गातीत दृष्टीने पहिले जाते. मार्क्सवादाच्या उदयापासूनच भाडवलदारांनी, त्यांच्या विचारवंतानी, प्रसारमाध्यमानी मार्क्सवाद हे हिंसक तत्वज्ञान यावर शिक्कामोर्तब केलेले आहे. आजतागायत ती प्रक्रीया सुरूच आहे. त्यामुळे भारतातील गांधीवादी, समाजवादी, आंबेडकरवादी  या प्रचाराचे बळी आहेत.

तत्वज्ञान म्हणून तात्विक अर्थाने मार्क्सवादाने हिंसेचा पुरस्कार केलेला नाही. मार्क्सवाद मानवी जीवनातील विकासात हिंसेची वस्तुस्थिती पुढे आणतो. या संदर्भात मार्क्सवादी विचारवत डी. डी. कोसंबी यांनी म्हटले आहे, “हवामान खाते ज्याप्रकारे  हवामानाचा  अंदाज व्यक्त करून वादळाची शक्यता आहे असे सांगते, ते वादळाचा पुरस्कार करते असे म्हणता येत नाही. त्याच प्रमाणे समजातील एकंदर वस्तुस्थितीचा अभ्यास करून हिंसेची शक्यता वर्तवली जाते तेव्हा मार्क्स हिंसेचा पुरस्कार करतो असे म्हणता येत नाही.”

कोणतीही शासक संस्था सहजासहजी आपले हितसंबंध सोडून देत नाही. उलट ती शोषित जनतेवर कल्पनेपलीकडचे अत्याचार, अन्याय, दडपशाही आणि अमानुष हिंसा लादते. तेव्हा तिचा प्रतिकार शांततेच्या मार्गाने करता येत नाही. या संदर्भात आपल्याला आदरणीय  नेल्सन मंडेला यांचे उदाहरण उद्बोधक ठरेल. सुरुवातीच्या काळात आफ्रिकन कॉग्रेसमध्ये सहभागी असणाऱ्या भारतीय वंशाच्या गोऱ्या कम्युनिस्टांबद्दल मंडेला यांना अविश्वास वाटत असे. कम्युनिस्ट हिंसेचा पुरस्कार करतात त्यामुळे व्हिक्स सरकार हिंसेचा आधार घेते असे त्यांना वाटत असे. त्यामुळे शांततेच्या, अहिंसेच्या, सत्याग्रहाच्या मार्गाने आंदोलन करावे अशी त्यांची धारणा होती. पण लवकरच त्यांना ही धारणा बदलावी लागली आणि ते कम्युनिस्ट बनले. सशस्त्र लढ्याची कमान त्यांच्यावरच सोपविण्यात आली. त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात या संदर्भात सविस्तरपणे लिहिले आहे. ते म्हणतात, “शोषित जनतेच्या हातातील हत्यार हे शोषक वर्गाच्या हत्याराचेच प्रतिबिंब असते. शोषित जनतेने कोणती हत्यारे वापरावीत हे शोषक वर्गच ठरवत असतो.” म्हणजे तो शांततेच्या मार्गाने जाईल तर शोषित जनताही शांततेच्या मार्गानेच जाईल. या संदर्भात रशियन कामगार क्रांतीतील उदाहरण उद्बोधक आहे. रशियन क्रांतीनंतर ब्रिटीश, अमेरिकन वर्तमानपत्रांनी लेनिन, स्टालिन यांची बदनामी करण्याची मोहीम उघडली. दोघे, “मानवी रक्तात बुडवून पाव खातात” इथपर्यंत अपप्रचाराची मजल गेली. हिंसेच्या संदर्भात लेनिन यांना पत्रकारानी प्रश्न विचारला तेव्हा लेनिन यांनी उत्तर दिले, “शांततेच्या मार्गाने क्रांती झाली असती तर ते आम्हाला आवडलेच असते. पण हिंसेची जबाबदारी त्या सज्जनांवर (प्रतीक्रांतीकारकांवर) आहे, त्यांनी क्रांतीच्या विरोधात शस्त्रे उपसली नसती तर आम्हालाही शस्त्रे उपसावी लागली नसती.”

आमचे समाजवादी आणि आंबेडकरवादी मित्र कम्युनिस्ट हे हिंसावादी आहेत असा प्रचार करायला आघाडीवर असतात. मध्यमवर्ग नेहमी शांततेच्या बाजूचा असतो, त्याचे पोटाचे प्रश्न सुटलेले असतात. त्यामुळे समाज परिवर्तन शांततेच्या मार्गाने व्हावे रक्त न सांडता व्हावे, मतपेटीतून व्हावे असे त्याला वाटत असते कारण त्याला समाज परिवर्तनाची फारशी निकड नसते. कामगार, आदिवासी, दलित समुहातील लोक जेव्हा मध्यम वर्गात जातात तेव्हा तेही याच विचारसरणीकडे वळतात. हाच वर्ग समाजवाद्यांचा आधारवर्ग आहे. “युरो – कम्युनिझम” चा हाच आधार वर्ग होता. दलितातून आलेल्या मध्यम वर्गाला तर आज जसा बौद्ध धर्माचा यासाठी आधार आहे तसाच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या काठमांडूच्या भाषणाचा आधार आहे. परंतु  बाबासाहेबानी बुद्धाच्या अहिंसेचा जो अर्थ लावला आहे या बद्दल काही बोलले जात नाही. बाबासाहेबांनी प्रतिकारशून्य अहिंसेची टिंगल केली आहे तशीच अतिरेकी अहिंसेचीपण टिंगल केलेली आहे. म. गांधी आणि जैन धर्माबाबत त्यांनी हि टिप्पणी केली आहे आणि बुद्धांच्या अहिंसेला शुराची अहिंसा असे म्हटले आहे, तुमच्या मनात हिंसेची भावना असता कामा नये परतू स्व-अस्तित्व धोक्यात आले तर स्व-रक्षणासाठी केलेली हिंसा… हिंसा ठरत नाही. मार्क्सवादाची हिंसेबद्दलची भावना या प्रकारची आहे. त्यामुळे कम्युनिस्ट जसे हिंसावादी नाहीत तसे अहिंसावादीही नाहीत. जो पर्यंत समाजातील परस्परविरोधी हितसंबंधांचा झगडा मिटत नाही तोपर्यंत हिंसेचे अस्तित्व संपुष्टात येणार नाही. ज्या रोहिणी नदीच्या पाण्यावरून शाक्य आणि कोलिय गणांचा संघर्ष पाहून बुद्ध मानवी जीवनातील दु;खाचा शोध घेण्यास घर सोडून गेले तो संघर्ष त्यांच्या हयातीत आणि आणि धम्माचा शोध लागल्यानंतरही मिटत नाही आणि आयुष्याच्या अखेरीला बुद्धांना त्याच्यातील रक्तरंजित संघर्ष पाहण्याची वेळ येते. ज्या समाजात शोषण अबाधित आहे त्या समाजात शांतता आणि अहिंसा सत्ताधारी वर्गालाच फायदेशीर ठरते कारण हिंसा केवळ हत्या इतपतच मर्यादित नसते. माणसाचे माणूसपण नष्ट करणाऱ्या सामाजिक परिस्थितीतही ती ओतप्रोत भरलेली असते. मला वाटते तात्विक पातळीवर मार्क्सवादी हिंसेचा मुद्दा या स्वरूपाचा आहे.

या पार्श्वभूमीवर आपण संघ परिवाराच्या हिंसेकडे पाहूया. हिंदू धर्माला विरोध करताना बाबासाहेबांनी म्हटले आहे, “इतर सर्व धर्मानी गुलामगिरीला विरोध केला आहे. किंबहुना इतर सर्व धर्म गुलामगिरीच्या विरोधात जन्माला आले आहेत, पण हिंदू धर्मच असा आहे ज्याने गुलामगिरीचे समर्थन केलेले आहे.” वेदाना प्रमाण मानणारी सनातन वैदिक संस्कृती जातीव्यवस्थेचे समर्थन करून  थांबत नाही तर तिला धर्मशास्त्राचा आधार देते. ब्राम्हणी वर्ण वर्चस्ववाद हा तिचा मूलाधार आहे. संघ-भाजपची विचारधारा हिच आहे. भारतीय संस्कृती संघर्षाचा इतिहास पाहू जाता आपल्या लक्षात येते ते म्हणजे वेद-उपनिषदाना प्रमाण मानणारी जातीव्यवस्था पुरस्कृत संस्कृती म्हणजे सनातन वैदिक संस्कृती आणि या सर्वाना विरोध करणारी संस्कृती म्हणजे अवैदिक संस्कृती. चार्वाकापासून तुकारामापर्यंत, गांधींपासून कलबुर्गीपर्यंत जी हिंसा दिसून येते ती  सनातन वैदिक संस्कृतीच्या नावावर जमा आहे. शेवटचा बौद्ध राजा बृहद्र्थ याचा खून करूनच पुष्यमित्र शुंगाने सत्ता हाती घेऊन सनातन वैदिक धर्माची द्वाही फिरविली. पुढे बौद्धांच्या, जैनांच्या, महानुभवांच्या, बसवेश्वरांच्या अनुयायांच्या कत्तलींचा इतिहास याच संस्कृतीच्या नावावर जमा आहे. त्या सनातन वैदिक संस्कृतीचा संघ उघड पुरस्कार करतो. ज्या संस्कृतीचे तत्वज्ञानच हिंसेवर उभे आहे, ती शोषक आहेच.

असे असताना केरळमध्ये हिंसेचे खापर मार्क्सवाद्यांवर फोडले जात आहे. गो रक्षकांचा धुमाकूळ अहिंसक आहे काय? केरळमध्ये ठोशाला ठोशा मिळाल्यामुळे ते आज कम्युनिस्टांविरूद्ध अपप्रचार करीत आहेत. पण कम्युनिस्टांनी केरळमध्ये अरेला कारे म्हटले नसते तर मुबईतील कम्युनिस्टांसारखे ते इतिहासजमा झाले असते. कृष्णा देसाईंच्या हत्येला योग्य ते उत्तर मिळाले असते तर मुबईतून कम्युनिस्ट हद्दपार झाले नसते. जर राजकीय हिंसेत केरळात कम्युनिस्टही लोकशाही पद्धतीने मातम  करत राहिले असते तर आज केरळ भगव्या पताक्यानी सजले असते. हिंसा सुरू केली ती संघाने, त्यांनीच ती संपवली पाहिजे. पण आज केंद्रात त्यांची सत्ता आहे आणि सत्तेच्या जोरावर ते कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण करून राष्ट्रपती राजवट आणू शकतात. राष्ट्रपती राजवटीचा वापर करून  कम्युनिस्टांना ठेचून काढायचे षड्यंत्र रचू शकतात. भाजपला विकली गेलेली प्रचार माध्यमे त्यांनी या कामाला जुंपली आहेत. असे असले तरी दुसऱ्या महायुद्धात जर्मनीला इशारा देताना जोसेफ स्टालिन यांनी म्हटले होते, “ तुम्हाला युद्धच हवे असेल तर युध्द कसे असते ते आम्ही तुम्हाला दाखवून देऊ.” आणि पुढचा इतिहास सर्वाना माहित आहेच. जे हिटलरला पुरून उरले त्यांचे आम्ही वारस आहोत. आम्हाला धमकावणे सोडून द्या. लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या डाव्या सरकारला जनतेच्या प्रश्नावर काम करू द्या. तुम्ही लोकशाही मार्गाने आणि शांततेने राजकारण करा हिंसेचा प्रश्न उद्भवणार नाही. पण तुम्ही शस्त्र घ्याल तर त्या समोर आम्ही निशस्त्र उभे राहू या भ्रमात राहू नका. नाठाळाच्या माथी काठी कशी मारायची हे तुकाराम बुवा आम्हाला फार पूर्वीच सांगून गेले आहेत.

 

लेखक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते व डाव्या चळवळीचे विचारवंत आहेत.

1 Comment

Write A Comment