वृत्त वाहिन्यांचा महापूर आणि वेबसाईट्सच्या त्सुनामीच्या या प्रलयात काहीतरी ओंजळभर योगदान आमचेही म्हणून `राईट अँगल्स’ सुरू करणे हा आमचा बिलकूलच उद्देश नाही. देशातील वातावरण पूर्णपणे धर्मोन्मादाने ढवळून निघालेले आहे. भारतातील लोकशाहीची घडी जी दादाभाई नौरोजी, महात्मा गांधींपासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर या आपल्या बापजाद्यांनी बसवली त्या लोकशाहीला आपल्या डोळ्यासमोर चिरडून टाकून त्यावर थयथया नाचणाऱ्या लोकशाहीविरोधी तत्त्वांना ठोस आणि ठाम विरोध आम्ही करणार या निर्धाराने हा नवा प्रयोग आम्ही करत आहोत.
पं. जवाहरलाल नेहरू असोत वा डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांच्या विश्लेषणाचा बाज वेगळा असला तरी मुख्य उद्देश हा विषमता नष्ट करून समता प्रस्थापित करणे हाच होता. माणसाला माणसाइतकी किंमत मिळायला हवी हा अट्टाहास स्वातंत्र्य आंदोलनातून तावून सलाखून निघालेल्या देशातील सुरुवातीच्या नेतृत्वाचा होता. व्यक्ती तितकी मते हे गृहीत धरूनही प्रत्येक मतास तितकीच किंमत देण्यामागचा नेमका उद्देशही हाच होता. बहुधर्मीय, बहुजातीय, बहुपंथीय, बहुभाषिक अशा या देशात एकसाची सनातनी विचारांवर आधारित समाज निर्मितीचे प्रयत्न तर खूप पूर्वीपासून होत आहेत. मात्र गेली नव्वद वर्षे देशातील ८० टक्के जनतेला गुलाम बनविण्याचे उद्दीष्ट मनाशी बाळगणारे सनातनी आज त्याच ८० टक्क्यांमधील काहींच्या पाठिंब्यावर राज्यकर्ते बनले आहेत. महाप्रचंड सत्ता, अवाढव्य यंत्रणा, अमाप संपत्तीच्या जोरावर लोकशाहीवादी सूर निघाला रे निघाला की त्याला चिरडण्यासाठी ते’ तंत्रज्ञानापासून ते घातक शस्त्रांनिशी अंगावर चाल करून येत आहेत. स्वातंत्र्य चळवळीत कणाचेही योगदान नसणारे, किंबहुना ब्रिटीशांना माफीपत्र लिहून देणाऱ्यांच्या वारसांची आज देश १९४७ साली नव्हे तर २०१४ साली स्वतंत्र झाला, असे थेट म्हणण्यापर्यंत आता मजल गेली आहे. सगळी प्रस्थापित प्रसारमाध्यमे त्यांच्या भितीने बुजून गेली आहेत. लोकशाहीवादी भूमिका घेणाऱ्यांवर छद्मराष्ट्रवादी खुलेआम देशद्रोहाचे शिक्के मारत आहेत. अल्बर्ट आईनस्टाइन म्हणाले होते की, राष्ट्रवाद म्हणजे केवळ पोरकटपणा आहे, मानवतेला झालेलं ते गोवर आहे.’ सध्या आपल्या देशात या पोरकटपणाने कळस गाठला आहे. एकीकडे मुस्लिमांना मध्ययुगातून बाहेर पडण्याचे स्वागतार्ह विधान करणारे दुसऱ्या बाजूला हे हिंदूराष्ट्र असल्याचे छातीठोकपणे सांगत आहेत. गोवंशाच्या रक्षणासाठी खुलेआम जिवंत माणसांना ठार मारले जात आहे. देशातील अभिजन यावर मिठाची गुळणी धरून आहेत. सत्तेत बसलेले त्याचे छातीठोक समर्थन करत आहेत. विकास म्हणजे केवळ उन्माद ही सत्तेत असलेल्यांची उघड भूमिका झाली आहे. म. गांधींच्या मारेकऱ्याची देवळे बांधण्याचे उद्योग सुरू झाले आहेत. बाबासाहेबांचे नाव घेत त्यांच्या राज्यघटनेच्या चिंधड्या उडवण्याचे काम सुरू आहे. आधुनिक भारत घडविणारे नेहरू तर जणूकाही चोर दरोडेखोर असल्याचा अविभार्वात कालची शेंबडी पोरंटोरं त्यांची टिंगलटवाळी करत आहेत. दुसरीकडे आक्रमक हिंदुत्वाच्या घोषणा देत उत्तर प्रदेशच्या गादीवर बसलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पाण्याच्या तांब्यावर वृत्तवाहिन्या एकेक तासाचे माहितीपट दाखवत आहेत. लोकशाहीकरिता परिस्थिती भयावह होते तेव्हा आपापल्या पातळीवर ती लढाई सगळ्याच लोकशाहीवाद्यांना लढावी लागते. त्या लढाईचाच एक भाग म्हणून `राईट अँगल्स’ आपल्या समोर येणार आहे. देशात, जगभरात घडणाऱ्या विविध घटनांचे राँग अँगल्स मनावर ठसवणाऱ्या प्रस्थापित प्रसारमाध्यमांमुळे जनतेचे मेंदू थिजून जाऊ नयेत, मेंदूने मेंदूचे काम करत राहावे, त्याची स्वतंत्र विचार करण्याच्या प्रवृत्ती प्राण्याप्रमाणे हुकमाचे ताबेदार होण्यात उत्क्रांत होऊ नये म्हणून या विविध घटनांचे राईट अँगल्स तुमच्यासमोर अनेक नामांकित ज्येष्ठ आणि तरुण लेखक घेऊन येणार आहेत. या राईट अँगल्सशी तुम्ही सहमतच व्हा, असा आमचा अट्टाहास बिलकूलच असणार नाही. कारण घटनांचे राईट अँगल्स सांगताना ते तुमच्याकडून समजून घेण्यातही आम्हाला रस आहे. मात्र थिल्लर टोमणेबाजी आणि टिंगल-टवाळीच करायची असेल तर सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे वाहिन्यांचा महापूर आणि वेबसाईट्सची त्सुनामी आलेली आहेच. लोकशाही वाचली तरच या देशाला भवितव्य आहे. लोकशाही वाचली तरच या देशातील तरुणांना भवितव्य आहे, इतक्या साध्या सोप्या उद्देशाने सुरू करत असलेल्या या प्रयोगाला तुमची जबरदस्त साथ मिळेल हा विश्वासानेच या प्रयोगाला सुरुवात करत आहोत!



